मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे जवळील कुंडमळा परिसरात इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी सायंकाळी कोसळून भीषण दुर्घटना घडली. वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर झाल्याने त्यावरचा भार वाढला आणि पूल अचानक कोसळून सुमारे ४० ते ४५ जण थेट नदीत कोसळले.
या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून ६ जणांवर तळेगाव येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अद्यापही काहीजण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाच्या ताफ्याने तातडीने धाव घेत बचावकार्य रात्रभर सुरू ठेवले. या प्रयत्नांमुळे ३८ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाशी थेट संपर्क साधत मदतकार्य जलद करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, या दुर्घटनेत आपले वडील गमावलेल्या एका तरुणाचा आक्रोश साऱ्यांच्या काळजाला चटका लावणारा ठरला. वडिलांचा मृतदेह रुग्णालयात पाहताच या तरुणाने फादर्स डे च्या दिवशीच हमसून हमसून रडत, हंबरडा फोडला. त्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आले. संबंधित तरुण आणि वडिलांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. समजते की, अपघाताच्या वेळी वडील ४०-५० जणांच्या पर्यटक समूहासोबत पुलावर होते आणि कोसळलेल्या पुलाखाली ते दबले गेले.
इंद्रायणी नदीवरील हा पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत होता. स्थानिकांनी यासंदर्भात वेळोवेळी आंदोलने करून डागडुजीची मागणी केली होती. शासनाने पुलाच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर केला होता, परंतु काम सुरू झाले नव्हते.
रविवारी पर्यटक पुलावर फोटो काढत असताना अचानक पुलाला तडा गेला आणि काही क्षणांतच संपूर्ण पूल कोसळला. पुलावर क्षमतेपेक्षा अधिक भार आल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या दुर्घटनेनंतर कुंडमळा आणि आजूबाजूच्या परिसरात संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. “वेळीच डागडुजी झाली असती, तर आजच्या दिवशी हे जीव वाचले असते,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.