Pune Crime (२४ जून २०२५): संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांचे मोबाईल आणि दागिने हिसकावणाऱ्या टोळ्यांविरोधात पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण २३ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून, यात २२.५ तोळे सोन्याचे दागिने आणि १४ मोबाईल फोन समाविष्ट आहेत.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांच्या सूचनेनुसार युनिट पाच व सहाचे विशेष पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने पोलिस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले.
या पथकाने चांदणी शक्ती कांबळे (३२), रिटा ऊर्फ गंगा कांबळे (३५), बबिता सूरज उपाध्ये (५७), पूजा धीरज कांबळे (३५, सर्व रा. उदगीर, लातूर) आणि गणेश विलास जाधव (३०, रा. सोलापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १९.४१ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण व मंगळसूत्र जप्त करण्यात आले. तपासात या आरोपींविरुद्ध हडपसर आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यांत आधीपासूनच गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.
तसेच, पालखीदरम्यान अरबाज नौशाद शेख (१९, रा. महाराजपूर, झारखंड) आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून ४.५ लाख रुपये किमतीचे १४ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी हडपसर आणि वानवडी पोलिस ठाण्यांमध्ये तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
मोबाईल किंवा दागिने चोरीस गेलेल्या नागरिकांनी हडपसर किंवा वानवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख आणि पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोलिस निरीक्षक संजय पतंगे, मदन कांबळे, तसेच राजस शेख, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखिले, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, बाळासाहेब सकटे, अकबर शेख, शेखर काटे यांचा सक्रिय सहभाग होता.