मुंबई : (Raj Thackeray MNS) राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena UBT) यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते, अशातच आज (गुरूवार 12 जून) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या भेटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – मनसे युतीला ब्रेक लागणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, आणि अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचं संकेत मिळू लागले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 10.35 मिनीटांनी फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि पुन्हा 11.35 ला बाहेर पडले.
एक तासभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली. मनसेचे अध्यक्ष हे 9.40 ला ताज लँड्स एंडमध्ये त्यांचा ताफा पोहचला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10.35 ला पोहचले होते. कोणतेही शेड्यूल नसताना दोन्ही नेते मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटीसाठी पोहोचले. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता थेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट चर्चेचा विषय बनला आहे. भेटीनंतर दोन्ही नेते हॉटेलमधून बाहेर पडले.
या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे भाजपने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना-मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव होता का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान,देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य दिलं नसून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास मोठे राजकीय समीकरण बदलू शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता या सर्व चर्चांना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त भेटीनंतर विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात पुन्हा सुधारताना दिसले. दोघे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.
मात्र, या संभाव्य युतीला ‘ब्रेक’ लागण्याचं मुख्य कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘राजकीय टाइमिंग’ असल्याचं बोललं जातं. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे फडणवीस हे खेळाचे जाणकार रणनीतीकार मानले जातात. त्यांनीच राज ठाकरे यांना योग्य वेळ साधून भेट घेऊन युतीपासून परावृत्त केलं असावं, असा कयास बांधला जात आहे. ही भेट मुंबईत वांद्रे येथील हॉटेलमध्ये झाली असून, ती पूर्वनियोजित नसल्याची चर्चा आहे.
या भेटीनंतर मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जातेय का, हा प्रश्न समोर आला आहे. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल, तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.मएकूणच, महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचे राजकारण चांगलेच तापले आहे, आणि या भेटींनी नवीन समीकरणांनाची उजळणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींच्या दृष्टीने आज महत्त्वाचा दिवस आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वांद्रयाच्या ताल लँड एन्ड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन बडे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री आहेत. संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे उदय सामंत यांच्या भेटीसाठी का पोहोचले? ते अजून समजू शकलेलं नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या दिवसात मोठा टि्वस्ट पहायला मिळू शकतो.
सध्या महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरु आहेत. दोन्ही बाजूंकडून युतीसाठी सकारात्मक घडामोडी सुरु होत्या. पॉझिटिव्ह पावलं उचलली जात होती. त्यात अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सामान्यतह: महाराष्ट्रातील काही प्रश्न असतील, तर मंत्रालयात भेट होते. पण ही भेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झाल्याने मनसे नेमकी कोणासोबत आहे? हा प्रश्न निर्माण होतोय.
“राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची काम असतात, काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील” असं शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले. “राजकारणात यू टर्न अनेक वेळा पाहायला मिळतात पण जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत बोलता येत नाही. जे काही होईल ते काही दिवसात समजेलच मात्र राजकारणात काही होऊ शकतं. “राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती, आजही आमची राज ठाकरे यांना ऑफर आहे, सोबत येण्यासाठी. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे” असं शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाट म्हणाले.