IMD Weather Update : देशात यंदा मान्सूनने वेळेपेक्षा तब्बल १२ दिवस आधीच हजेरी लावली असून, महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर आता हवामान विभागाने पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस देशातील पूर्वोत्तर, उत्तर-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भारतातील सुमारे २० राज्यांमध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत वादळही झोडपून काढण्याची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोणत्या राज्यांना इशारा?
पूर्वोत्तर भारत : १ जूनपासून आसाम, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि सिक्किमच्या काही भागांनाही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर भारत : दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ४० ते ७० किमी/तास इतका असू शकतो. विशेषतः उत्तराखंडमध्ये १ ते ४ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, तर पंजाब-हरियाणामध्ये ३ जूनला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दक्षिण भारत : केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये पुढील चार दिवस वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य भारत: मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक भागांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. बिहारमध्येही हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.
सावधगिरी बाळगा : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, वीजेच्या तारा, झाडांपासून दूर राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.