Electric Shock : महेशsss लेकाचा निपचित देह पाहून पित्याचा टाहो, हात लावताच सगळं संपलं, कुटुंबावर दुहेरी संकट
अहिल्यानगर : जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या बाप- लेकाचा शेतातील खाली पडलेल्या विजेच्या तारांना चिकटून जाग्यावरच मृत्यू झाला. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभारामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे वस्ती येथील बाळगव्हाण ग्रामपंचायतचे सदस्य काकासाहेब दौलत शिकारे, वय 42 वर्ष आणि त्यांचा मुलगा महेश काकासाहेब शिकारे, वय 15 वर्ष, हे दोघे बाप-लेक उसाच्या शेतात खत टाकण्यासाठी गेले होते.
मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वी खर्डा परीसरात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान होऊन अनेक विजेचे पोल पडले होते तर काही ठिकाणी विजेच्या तारा खाली पडल्या होत्या. बाळगव्हाण येथील घटना घडलेल्या शेतात देखील विजेच्या तारांचे पोल खाली पडल्यामुळे या विजेच्या तारा उसाच्या शेतात पडल्या होत्या.
मात्र याठिकाणी प्रथम मुलगा खत टाकण्यासाठी गेला तेव्हा त्याला खाली पडलेल्या तारा न दिसल्याने या तारांना चिकटून त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे वडील काकासाहेब शिकारे हे पाठीमागून शेतात आले व मुलाला चिकटलेले पाहून ते देखील त्याला वाचवण्यासाठी गेले मात्र त्यांनाही या विजेच्या तारांचा करंट बसून मृत्यू झाला. ही घटना दुपारी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे.
मात्र रात्री उशिरा वडील आणि मुलगा शेतातून घरी आले नसल्याने रात्री सात वाजण्याच्या सुमारास त्यांचे नातेवाईक व गावातील ग्रामस्थ हे शेतात त्यांना शोधण्यासाठी गेले. यावेळी त्यांना वडील व मुलाचा विद्युत तारांना चिकटून मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती समजताच खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी घटनास्थळाला भेट देऊन पुढील कारवाई करून तपास सुरू केला आहे. दोन्ही मृतदेहावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
पंधरा ते वीस दिवसापूर्वी वादळी वाऱ्याने बाळगव्हाण परीसरातील वीज मंडळाच्या खांबावरील तारा तुटल्या होत्या, याबाबत येथील नागरिकांनी वीज प्रवाह तुटला असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु त्यांनी तारा जोडून वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे, असे शिकारे वस्ती व बाळगव्हाण ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यांच्या दुर्लक्षामुळे या बाप लेकाचा बळी गेल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे. तरी संबंधित विद्युत महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आमदार रोहित पवार म्हणाले, ही अत्यंत दुःखद घटना आहे. या दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या वादळात तुटलेल्या या तारा अद्यापही तशाच पडून आहेत आणि त्यामुळंच या बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला.
याला पूर्णतः महावितरण जबाबदार आहे. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कधीही भरून न निघणारी हानी लक्षात घेता शिकारे कुटुंबालाही मदत करावी.