वर्षभराची लेक आणि पत्नीला ट्रेनमधून फेकलं, पण पुरावे मिटवताना घोडचूक.. हैवानाला कसं पकडलं ?

कानून के हात बहोत लंबे होते है… गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो कायद्यापेक्षा हुशार नसतो, कुठे ना कुठे, छोटीशी तरी चूक होतेच आणि मग होते गुन्ह्याची पोलखोल.. उत्तर प्रदेशातही असंच काहीस घडलं. उत्तर प्रदेशातील इटावा येथे पत्नी आणि निष्पाप मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी, जलदगती न्यायालयाने सिव्हिल इंजिनिअर चंदन राय चौधरी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.न्यायालयाचा हा निर्णय केवळ न्यायालयीन प्रक्रियेचे गांभीर्यच प्रतिबिंबित करत नाही तर कितीही विचारपूर्वक गुन्हा केला तरी कोणीही कायद्याच्या तावडीतून सुटू शकत नाही हेही त्यातून स्पष्ट होतं.

ही दुर्दैवी घटना 2020 सालची आहे, जेव्हा आरोपी चंदन रायने मगध एक्सप्रेसमधून प्रवास करताना फाफुंड स्टेशनजवळ त्याची पत्नी पोरवी गांगुली आणि एक वर्षाची मुलगी शालिनी यांना चालत्या ट्रेनमधून खाली ढकलले. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघींचाही जागीच वेदनादायक मृत्यू झाला. सुरुवातीच्या तपासात हा एक सामान्य अपघात वाटत होता, परंतु सखोल तपास केला असता ही घटना अपघात नव्हे तर अतिशय विचारपूर्वक, नियोजित खून असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीचे चंदनचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यामुळेच त्याला पत्नी आणि लेकीचा काटा काढायचा होता. हत्येनंतर, चंदनने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या पत्नीचा मोबाईल तोडला आणि रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला, परंतु एवढं करूनही त्याच्याकडून एक चूक झालीच. ती म्हणजे त्याने मृत पत्नीचे सिमकार्ज वापरणं सुरूच ठेवलं. आणइ त्यात डिजिटल पुराव्यामुळे संपूर्ण कहाणी उघड झाली असं सरकारी वकील शिवकुमार शुक्ला म्हणाले. कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना चंदनच्या हालचालींची माहिती मिळाली. हा इलेक्ट्रॉनिक पुरावा न्यायालयात निर्णायक ठरला.

मृत महिला पोरवी हिचे वडील प्रदोष गांगुली यांनी इटावा जीआरपीमध्ये हुंड्यासाठी छळाची तक्रार दाखल केली होती, जी नंतर खुनाच्या गुन्ह्यात रूपांतरित झाली. खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारी वकिलांनी न्यायालयात 12 सशक्त साक्षीदार आणि वैज्ञानिक पुरावे सादर केले, ज्यामुळे आरोपी कोणताही बचाव करू शकला नाही. हा गुन्हा केवळ खून नाही तर मानवतेच्या नावावरचा कलंक आहे असं अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (जलद ट्रॅक) सुनीता शर्मा यांनी त्यांच्या निकालादरम्यान म्हटलं.

अवघ्या वर्षभराच्या निष्पाप मुलीच्या हत्येने समाजाचा आत्मा हादरला असून महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. या दुर्दैवी घटनेनंतर अनेक वर्षांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळाला आणि न्यायालयाने आरोपी पतीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.