Pratik Gangane – शेवटी काय मिळालं या युद्धातून? – गर्जना झाली, पण फलित काय?
पुणे – “घुस के मारेंगे!” या घोषणा डोक्यात घोळत होत्या, मन देशाभिमानाने फुलून आलं होतं. पहेलगाममध्ये 28 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. ‘यावेळी चूकवणार नाही’, ‘परत वार केल्यावर परतवार होईलच’ अशा अपेक्षांवर लोक उभे होते. सरकारनेही अपेक्षा उंचावल्या – भाषणं, पोस्टर्स, परदेशी दौऱ्यांतून पाकिस्तानवर दबाव टाकण्याचे दावे झाले. “ही लढाई शेवटची ठरणार”, “पाकिस्तानला धडा शिकवूनच थांबू” असं ठामपणे सांगितलं गेलं.
मग सुरु झाली ऑपरेशन सिंदूर — गर्जना, आक्रमकता, आणि मीडियात चढवलेला प्रचंड गाजावाजा. पण त्याच रात्री पाकिस्तानकडून भीषण प्रतिहल्ला झाला. 15 भारतीय जवान हुतात्मा झाले, 43 गंभीर जखमी झाले, काश्मीरचे आयुक्त थापा शहीद झाले. देश थरथरला. मग प्रश्न पडतो — आपण काय साध्य केलं?
आजवर पाकिस्तानविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राईक, राजनैतिक दबाव, जागतिक समर्थन अशा गोष्टी ज्या मोठ्या शब्दांत मांडल्या गेल्या, त्यांचं शेवटी काय झालं? हाफिज सईद, दाऊद इब्राहीम, आणि पहेलगाम हल्ल्याचे सूत्रधार आजही मोकाट आहेत. यापैकी एकालाही भारताच्या ताब्यात आणता आलं नाही. इतकंच नाही तर, युद्धबंदीच्या निर्णयामध्ये भारताची अटही लावली गेली नाही. पाकिस्तानने एकही दोषी आपल्या ताब्यात दिला नाही. मग युद्धबंदीमागचा खरा हेतू काय?
भारत-पाक संघर्षात हवाई कारवाईनंतर राजकीय वादळ; इंदिरा गांधींच्या इतिहासाशी मोदींची तुलना
अमेरिकेने जाहीर केलं की त्यांच्या मध्यस्थीने युद्ध थांबलं. हे ऐकून सामान्य भारतीयाला धक्का बसला. अमेरिका कोण मध्यस्थी करणारी? 1971 च्या युद्धात कोणी मध्यस्थी केली होती का? 1965 मध्ये कोणी थांबवलं होतं? मग आज आपला निर्णय आपण घेऊ शकत नाही का? याला नवा भारत म्हणायचं का?
दुसरीकडे, पाकिस्तानला 8500 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं जातं. जागतिक बँक, IMF, चीनसारखे देश त्यांना मदत करतात. भारताच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना प्रेस फ्रीडमच्या नावाखाली पाठिंबा मिळतो. आणि आपला देश? — इजराईल वगळता कोणीही आपल्या बाजूने उभं राहत नाही.
डॉक्टर चुकले, पण ChatGPT ने केला चमत्कार! वाचाल तर म्हणाल… काय असं कसं घडलं?
युद्धबंदी झाली खरी, पण पाकिस्तान संतासारखा वागणार आहे का? आजही LoC वर गोळीबार सुरुच आहे. आजही भारतीय जवानांचे प्राण जात आहेत. आजही काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचं जाळं सक्रिय आहे. आजही पाकिस्तानात बसलेले दहशतवादी भारताविरुद्ध कट रचत आहेत. मग युद्धबंदीमुळे आपल्याला नक्की काय मिळालं?
आपण जर खरोखर ठाम असतो, तर पाकिस्तानपुढे अट ठेवता आली असती – “पहेलगाम हल्ल्याचे आरोपी भारताच्या ताब्यात द्या”, “हाफिज सईद आणि दाऊद इब्राहीम भारतात सोपवा”, “POK मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा”, तरच युद्धबंदी स्वीकारू. पण तसं झालं नाही. कारण घोषणा करणे सोपं, पण त्या प्रत्यक्षात उतरवणं कठीण.
आज ज्यांनी आधीच्या सरकारवर टीका केली – “पाकिस्तानला काहीही केलं नाही”, “दाऊदला का नाही आणलं?” – त्याच सरकारने आज तोंड बंद ठेवलं आहे. युद्धाच्या नावाखाली नुसती ध्वनीफेक, वारेमाप वल्गना, आणि शेवटी राजनैतिक लाचारी.
भारतीय माध्यमांनीही या सगळ्यात आपली विश्वासार्हता गमावली. लाहोर-इस्लामाबादला पाठवलेले रिपोर्टर ‘जिंकले’चा घोषणा करतात आणि युद्धबंदी लागली की परत गप्प होतात. कोण सांगणार जनतेला सत्य काय आहे? कोणी विचारणार की “आता पुढे काय”?
आज जरी युद्ध थांबवलं गेलं, तरी मनात एक दुःख आहे – हे युद्ध आपण जिंकलो नाही, आपण गमावलं. आणि आपल्याला या गमावण्याचं दु:खही नीट व्यक्त करू दिलं जात नाही.
शेवटी निष्कर्ष हा की : “दुसऱ्या देशाचा नकाशा पुसणं, त्याचे दोन तुकडे करणं, 96 हजार सैनिक युद्धबंदी करणं, आणि त्यांच्या पंतप्रधानांना सिमला करारावर सही करायला लावणं… हे आपल्या सध्याच्या नेतृत्वाच्या आवाक्याबाहेरचं आहे.”
- PRATIK GANGANE, PUNE (EDITOR PUNE PRAHAR)
- 7276314142