सरनाईकांवरील धाडीसाठी पुण्याहून खास फौजफाटा मागवला

155

ठाणे: मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकताना ईडीने स्थानिक प्रशासनाला या कारवाईचा थोडाही सुगावा लागू दिला नाही. ही कारवाई करण्यासाठी ईडीने पोलिसांची मदत घेण्याऐवजी सीआरपीएफच्या पथकाला खास पुण्याहून बोलावून घेतलं.

हे पथक आल्यानंतर ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाडी मारून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. ईडीने पूर्ण तयारी करूनच ही कारवाई केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाड टाकली. ईडीने ठाण्यातील हिरानंदानी येथील प्रताप सरनाईक यांच्या 23व्या मजल्यावरील घरावर, वर्तकनगरमधील कार्यालयावर आणि घोडबंदर रोडवरील विहंगम हॉटेलवर आज सकाळी धाड मारली. त्याच बरोबर सरनाईक यांच्या विहंग आणि पूर्वेश या दोन्ही चिरंजीवांच्या कार्यालय आणि घरावरही धाड मारली.

ईडीने सरनाईक यांच्या एकूण दहा ठिकाणांवर धाड मारली आहे. ही धाड मारण्यापूर्वी ईडीने पूर्ण तयारी केली होती. ईडीने पोलिसांसह स्थानिक प्रशासनालाही या धाडीचा सुगावा लागू दिला नाही. त्याऐवजी पुण्यातून एसआरपीएफचं एक पथक मागवलं होतं. या पथकात एकूण 40 जवान होते. हे जवान ठाण्यात येताच ईडीने एकाचवेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाड मारल्याचं सूत्रांनी सांगितलं. राज्यात शिवसेना आघाडीचं सरकार आहे.

त्यामुळे पोलीस किंवा स्थानिक प्रशासनाला ईडीच्या धाडीची कुणकुण लागल्यास कारवाईत व्यत्यय येऊ शकला असता. त्यामुळेच ईडीने पूर्वतयारी करूनच ही कारवाई केल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

सरनाईक हे घरी नाहीत. ते बाहेर गेले आहेत. त्यांच्या गैरहजेरीत ही धाड मारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच ईडीने अचानक मारलेल्या या धाडीमुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे.

सरनाईक हे आमदार असले तरी ते बांधकाम व्यवसायिक असल्याने मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. ईडीने धाड मारल्यानंतर आता पोलिसांनी सरनाईक यांच्या घरी धाव घेतली आहे.

ईडीने भाजपची शाखा असल्याप्रमाणे कारवाई करू नये

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईवरून ईडी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ईडीने भाजपची शाखा असल्याप्रमाणे कारवाई करू नये.

भाजपने राजकीय सुडबुद्धीतून ही कारवाई केली असून आम्ही अशा कारवायांना घाबरणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. काळ कुणासाठी थांबत नसतो. ईडीचे हे उद्योग एक दिवस तुमच्यावरही उलटतील, असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे.