पुणे : करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विवाह समारंभ आणि गर्दी होणाऱ्या अन्य समारंभांच्या ठिकाणी कडक निर्बंध लावले आहेत. विवाह समारंभाला ५० लोकांनाच परवानगी देण्यात येणार असून, त्या ५० लोकांमध्ये वाजंत्री, भटजीपासून ते आचारी आणि मदतनीस यांचीही गणना केली जाणार आहे. उपस्थित राहणाऱ्या या लोकांची यादी विवाह समारंभापूर्वी, तर विवाह समारंभ झाल्यावर त्याच्या चित्रिकरणाची ‘सीडी’ पाच दिवसांत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
समारंभाची ‘सीडी’ पाच दिवसांत द्या!
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्यक्ष विवाह समारंभाच्या ठिकाणी कार्यालयाचे मालक किंवा व्यवस्थापकांनी कोणकोणत्या सुविधांची व्यवस्था करावी, याबाबतही जिल्हाधिकारी देशमुख यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ समारंभाला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक आणि स्वाक्षरी घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सॅनिटायझर आणि येणाऱ्या नागरिकांचे शरिरातील तापमान मोजण्याची यंत्रणा उपलब्ध करून देण्याचे कार्यालय मालक किंवा व्यवस्थापक यांना सूचविण्यात आले आहे. विवाह समारंभ झाल्यानंतर त्याची ‘सीडी’ पाच दिवसांत संबंधित पोलिस ठाण्याला देण्याचेही बंधन घालण्यात आले आहे.
जेवताना गप्पा मारू नका!
विवाह समारंभाला उपस्थित असलेले नागरिक हे जेवण करत असताना सुरक्षित वावर राहील, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत. त्यासाठी प्रत्येकी सहा फुटांवर खुणा करण्यात याव्यात. जेवण करताना मास्क काढल्यावर उपस्थित नागरिकांनी एकमेकांशी गप्पा मारू नयेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.
नियमांचे उल्लंघन होणार नाही, यासाठी ग्रामीण भागात विवाह समारंभाची पाहणी करण्यासाठी पोलिस, ग्रामसेवक, तलाठी आणि पोलिस पाटील यांचे भरारी पथक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील; तसेच कार्यालयाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.