औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात समन्वय गरजेचा विकास टोपले यांचे मत

65

पुणे : औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात समन्वय गरजेचा विकास टोपले यांचे मत गेल्या काही वर्षांपासून उत्कृष्टता साधण्यासाठी औद्योगिक व शिक्षण क्षेत्रात परस्पर संवाद गरजेचा असल्याची चर्चा होते. मात्र, प्रत्यक्षात यावर तेवढ्या प्रमाणात काम होत नाही. गुणवत्तापूर्ण कामासाठी हा समन्वय महत्वाचा असून, त्यावर प्रभावी काम व्हावे. जर भारतीय रासायनिक उद्योगाला चीनमधून आयातीतील आव्हाने स्वीकारायची असतील, तर खर्चाची स्पर्धात्मकता साध्य करण्यासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना अर्थपूर्णपणे एकत्र काम करावे लागेल, असे मत कुरकुंभ एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष विकास टोपले यांनी व्यक्त केले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल इंजिनिअर्सच्या (आयआयसीएचई) पुणे प्रादेशिक केंद्राच्या वतीने आयोजिलेल्या ‘रासायनिक प्रक्रिया व अभियांत्रिकी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन विकास टोपले यांच्या हस्ते झाले. ‘रासायनिक अभियांत्रिकी तत्वांच्या साहाय्याने रासायनिक प्रक्रिया सुधारणे’ ही चर्चासत्राची मध्यवर्ती संकल्पना होती.

एमआयडीसी कुरकुंभ येथे झालेल्या या चर्चासत्रात विविध अकरा विषयांवर चर्चा झाली. यामध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), सिप्ला यासह इतर संशोधन संस्थेतील रासायनिक अभियंते व शास्त्रज्ञानी उहापोह केला. सिप्ला कुरकुंभचे वरिष्ठ उपाध्यक्ष मंगेश वझे, भगवान खंदार, पवन वाघमारे, ‘एनसीएल’ येथील शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रोडे, डॉ. विनय भंडारी, डॉ. संजय कांबळे, अरुण कालगुड  यांच्यासह इतर तज्ज्ञांनी आपली मते मांडली. संशोधन प्रबंध सादर झाले. चेतन सायनकर व विजय रेड्डी यांनी डिस्टिलेशन संदर्भातील सादरीकरण केले.

शेवटी, चर्चासत्रापासून सुरू झालेली परस्परसंवादाची प्रक्रिया सातत्यपूर्ण आधारावर पुढे नेण्यात यावी, जेणेकरून भारतातील रासायनिक उद्योग केवळ चीनमधून होणाऱ्या आयातीशी स्पर्धा करू शकत नाही, तर निर्यात बाजारपेठेतही स्पर्धा करू शकेल, असा निर्धार करण्यात आला. ‘आयआयसीएचई’ पुणे प्रादेशिक केंद्राचे अध्यक्ष अलोक पंडित यांनी प्रास्ताविक केले. यशवंत घारपुरे यांनी चर्चासत्राच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.