पुणे, दि. ७ : नरेंद्र मोदी सरकारच्या मेहरबानीने झालेल्या अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी करावी, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), एलआयसी यासह इतर बँकांमधील जनतेचा पैसा सुरक्षित रहावा, यासाठी युवक कॉंग्रेस आणि ‘एनएसयुआय’ यांच्यातर्फे एलआयसीच्या कार्यालयासमोर निदर्शने व आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी एलआयसीच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन, युवक काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष राहुल शिरसाट, ‘एनएसयुआय’चे अध्यक्ष भुषण रानभरे, बळीराम डोळे, सौरभ आमराळे, दिलीप जाधव, अभिजीत हळदेकर, अक्षय माने, परवेज तांबोळी, अजित ढोकळे, प्रसन्न मोरे, राज जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अक्षय जैन म्हणाले, “मोदी सरकारच्या मेहरबानीने जनतेच्या पैशावर गर्भश्रीमंत झालेल्या अदानींचा गैरकारभार हिंडेनबर्ग रिपोर्टने जनतेसमोर आणला आहे. बोगस कंपन्या उभारून शेअर्सची किंमत वाढवून लाखो कोटीचे कर्ज एसबीआय, एलआयसी आणि इतर बँकांकडून घेतले. हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे शेअर्सच्या किमती कमी झाल्या. गुंतवणुकधारकांचे लाखो कोटी बुड़ाले, त्याचा झटका अदानीना नाही, तर जनतेला बसला. एसबीआय व एलआयसीमध्ये गुंतवणूक केलेले नागरिक अडचणीत आले असून, त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
“जनतेचा हा पैसा सुरक्षित रहावा, त्याला सरकारने संरक्षण द्यावे, अदानीच्या ग़ैरकरभाराची चौकशी करावी, यासाठी राहुल गांधी संसदेत आवाज उठवत आहेत. संसदेत गोंधळ सुरु आहे. पण मोदी सरकार त्यांच्यावर कुठलेही कारवाई करायला तयार नाही. उलट ‘हम दो’ म्हणजे मोदी आणि अमित शहा व ‘हमारे दो’ गौतम अदानी व मुकेश अंबानी यांना घेऊन त्यांच्या फ़ायद्यासाठी देश चालवत आहेत,” असेही अक्षय जैन यांनी नमूद केले.